माझी भटकंती पंढरपूर अक्कलकोट १०६






   माझी भटकंती 
धार्मिक सहल 
सन २००० पहिला दिवस 
भाग क्रमांक १०६
    पंढरपूर व अक्कलकोट 

उनाची ताप चांगलीच जाणवत होती  त्यामुळे उन्हाच्या झळ्या बसत होत्या.तरी तसाच प्रवास चालला होता.पुढं पुढं तर ऊन वाढतच होतं.तरी तसच आम्ही पंढरपूरला पोहोचलो.चंद्रभागेच्या भल्यामोठ्या तीरावर गाडी पार्क केली.चालत चालत विठूरायाच्या , पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तिभावाने निघालो. पंढरपूर श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांचे पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र,दक्षिण काशी म्हणून लौकिक आहे.वैष्णव भाविकांचे आराध्य दैवत पंढरीचा  पांडुरंग.हे शहर चंद्रभागा (भीमा) नदीच्या काठावर आहे.आषाढी कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायातील भाविकांचा मेळा जमतो.भक्तांच्या मांदियाळीने ,टाळमृदुंगाच्या गजराने,हरीच्या नामस्मरणाने अवघी पंढरी नगरी भक्तीरसात न्हाऊन निघते.अमाप उत्साह आणि ऊर्जेची "पंढरीची वारी " अनेक संतांच्या दिंड्या विठूरायाला भेटायला पायवारीत येतात.ह्रदयात असणाऱ्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जाताना पंढरीची वारी नजरेसमोर येते.दर्शन रांगेत गर्दी असल्याने नामदेव पायरी पासून मंडपात जावून महाराष्ट्राचे कुलदैवत श्री पांडुरंगाचे जोडीने दर्शन घेतले. मंदिरात शांतचित्ताने नामस्मरण करीत साजिरं रुप ह्रदयात साठवित बसलो.मंदिराचे गाभारा,अंतराळ आणि सभामंडप असे भाग आहेत.मंडपात १६ खांब असून चांदीचं आवरण असलेल्या खांबाला गरुडस्तंभ म्हणतात.
मन प्रसन्न व तजेलदार झाले.शहरात अनेक देवदेवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत.मंदिराच्या उत्तरेला कैकाडी महाराजांचा मठ आहे.
तदनंतर महाप्रसाद पुडा,कुंकू अबीर आणि गंधगुळी घेतली.
चहापान करून सोलापूर कडे निघालो.आजचा पहिला मुक्काम  अक्कलकोट इथं करायचा होता..
            पंढरपूर ते सोलापूर हे अंतर सुमारे ७५किमी असावे.
आम्ही मोहोळ मार्गे सोलापूरला निघालो . दोन-तीन तासांनी सोलापुरात पोहोचल्यावर सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावरील श्री स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोटला निघालो.सायंकाळच्या वेळातला प्रवास बऱ्यापैकी गारवा देत होता.घरगुती गप्पागोष्टी करत निघालो होतो.. तिन्हीसांजेला अक्कलकोट मध्ये आलो.गाडीचे पार्किंग केले.आणि मंदिर परिसरातील भक्तनिवासकडे निघालो.तिथं मुक्कामाची चौकशी केली असता सर्वासाठी एक कॉमनरुम मिळाली.मग रुममध्ये जावून मस्तपैकी फ्रेश झालो.काहीवेळाने आरतीसाठी मंदिराकडे निघालो.आरतीला शांतचित्ताने उभे राहून टाळ्या वाजवित होतो.. हळूहळू आरतीला गर्दी वाढू लागली. माझं मन स्वामींचे रुप आणि मंदिर परिसराचे मंगलदृश्य मनाच्या गाभाऱ्यात साठवून लागलं.श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांना नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या दत्तात्रय  रुपातील अवतार समजले जाते.ते वडाच्या झाडाखाली बसून ध्यानधारणा करीत असत.त्यांचे प्रसिध्द वचन ,"भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे."अवाढव्य वडाच्या झाडाच्या सभोवताली मुख्यमंदिर आहे.प्रशस्त सभामंडप असून तिथं बरेचजण ध्यानस्थ बसून जप करताना दिसतात.
मंदिराजवळ भक्तनिवास आहे.तेथून जवळच अन्नछत्र आहे.तिथं दररोज दुपारी व रात्री मोफत भोजन प्रसादाची सोय आहे.एव्हाना आरतीचे सूर मंद होत आले होते.ओळीने सर्वांनी प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात समर्थांचे  दर्शन घेतले.थोडावेळ तिथंच शांतपणे श्री स्वामी समर्थ महाराज आणि मंदिर याविषयी माहितीपर चर्चा करत बसलो.तदनंतर दुतर्फा असणाऱ्या दुकानात जाऊन  प्रसाद व खेळणी खरेदी केली.भक्तनिवासात गेलो.आठच्या दरम्यान अन्नछत्रालयात जाऊन पंगतीनं भोजन प्रसादाचा लाभ घेतला.जरा शतपावली केली.निवासाच्या ठिकाणी आलो.उद्या सकाळी सहा पूर्वी आपण गाणगापूरला जाऊया म्हणजे इथं दुपारपर्यंत माघारी येता येईल.अशा नियोजन चर्चा केली .आणि विश्रांती घेतली..
जय श्री स्वामी समर्थ.....श्री स्वामी समर्थ 
भाग क्रमांक १०६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड