पुस्तक परिचय क्रमांक-८४ चैतन्यवेल
#वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
पुस्तक परिचय क्रमांक-८४
पुस्तकाचे नाव - चैतन्यवेल
कवीचे नांव - मनोज अग्रवाल
प्रकाशक - साहित्य प्रसार केंद्र, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-आॅक्टोंबर २०२१/प्रथमावृत्ती
पृष्ठे - ८६
साहित्य प्रकार-कवितासंग्रह
मूल्य - १२०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
८४||चैतन्यवेल
कवी-मनोज अग्रवाल
कवितासंग्रह
****************************************
चैतन्यवेल
वाहतील नवस्फुर्तीचे वारे
तेजाळतील नवतेज सारे
निवळूनी विकार सारे
उन्नत मार्ग उमगेल
धरुनी धीर थोडा
चैतन्यवेल स्फुल्लिंगेल|
चैतन्य म्हणजे नित्य नवीन,टवटवीत असलेला नित्य नवीन चेतना देणारी वेल म्हणजे 'चैतन्य वेल'उद् यनमुख कवी,वाचसाखळी समूहाचे सदस्य श्री मनोज अग्रवाल यांचा 'चैतन्यवेल' हा कवितासंग्रह ६ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध कवी आदरणीय डॉ. दासू वैद्य सर व वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांच्या शुभहस्ते मोठ्या समारंभात औरंगाबादमध्ये साहित्ययात्रींच्या शुभहस्ते विविध सन्मान्यशाली मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मलाही सरांनी व्हाटसअपवर काव्यसंग्रह प्रकाशित सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पाठविली होती.दूरवरचे प्रवाशी असलेतरी तरी आभासी मिडियाद्वारे विविध साहित्यकृतीतून भेट घडतच राहते.
'चैतन्यवेल'कवितासंग्रह फेसबुक स्नेही, शिक्षकमित्र,कवी आणि प्रतिभाताई लोखंडे यांचे मानसपुत्र श्री मनोज अग्रवाल, औरंगाबाद यांनी 'आठवण भेट'म्हणून पोस्टाने पाठविला. प्रथमत: आपले हार्दिक अभिनंदन! आपण आपल्या भावभावनांना शब्दबध्द करून काव्य नव्या उर्मिने निर्माण केलेत. साहित्ययात्रींच्या प्रांगणात काव्यसंग्रहाचा ठसा उमटविलात. सुंदरशा अक्षर फुलोऱ्यात कवितेला सजवून काव्यरसिक श्रोत्यांना वाचनास्तव 'चैतन्य वेल' हा काव्यसंग्रह लोकार्पण केलात.. आपणास मनपुर्वक धन्यवाद!!!
मलपृष्ठावर प्राध्यापिका मीनल येवले यांनी कवी मनोज अग्रवाल यांचा नेटक्या शब्दात गौरव करुन शुभेच्छा दिल्यात!त्या म्हणतात की,"पेशाने शिक्षक असलेल्या मनोज अग्रवाल यांच्या सकारात्मकतेने ओतप्रोत भरलेल्या लेखणीचा मूळपिंड विचारप्रवर्तकपरिवर्तनाकडे झुकणारा आहे. जनमनात शिस्त, सुसंस्कार, सद् विचारांची रुजवणूक करण्यासाठी त्यांच्या लेखणीची धडपड दिसते. माणूस सुखाच्या शोधात पायाला भिंगरी बांधून धावत सुटला आहे. खरं सुख कशात आहे हे अंतर्मुख होऊन शोधण्याची गरज आहे. प्रामाणिकपणे केलेले श्रम,निहित कर्तव्याची पूर्ती, वयस्कांचा आदर ,संत विचारांचा आदर,सदाचरण, मनाचा संयम जिद्द, सारासार विवेकबुद्धी यातूनच जगण्याचा खरा मार्ग गवसतो.
निरनिराळे रंग जरी संस्कृती निराळी, एकोप्याने राहू सारे, आज प्रतिज्ञा आपुली. या जगात असे काही नाही. निर्मिकाने सुंदर सृष्टी निर्माण केली. त्यावर सुंदर असे जीवन त्यांने मानवाला बहाल केले.एकजुटीने राहून समाजाचा विकास करण्यासाठी मानवाने उदार दृष्टी ठेवणे महत्त्वाचे आहे. कवितेच्या प्रांतात मनोज अग्रवाल यांच्या आशावादी कवितांचे निश्चितच स्वागत होईल.त्यांच्या पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा!!"
या कवितासंग्रहाची प्रस्तावना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या सदस्या आणि फेसबुक वाचन साखळी समूहाच्या संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे यांनी अत्यंत सुंदररित्या लिहिलेली आहे.'चैतन्यवेल' हा काव्यसंग्रह सामाजिक मूल्ये आणि जीवन कौशल्यांना नवर्या जाणिवेने जिवंत करुन काव्यात्मक रुपात गुंफण्याचा उत्तम प्रयत्न या काव्यसंग्रहात केलेला आहे.आपल्या कर्तव्य मार्गावर सदैव चालताना निर्मळ,सुंदर जीवनाचा जर आनंदानुभव घ्यायचा असेल तर चरैवति….चरैवति…..त्यांनी कवितेतील ओळींचा अन्वयार्थ सुंदरशा शब्दात उलगडला आहे.
विचार मनातले….या लेखातून कवी मनोज अग्रवाल व्यक्त झाले आहेत.कवितेचा उगम कसा घडत गेला.जीवनातील मुक्त आविष्कार , अनुभव ,घटनाप्रसंग,चिंतन आणि मनन यातून स्फुरलेल्या या सगळ्या कविता आहेत.यातील बऱ्याच कविता काव्यसंमेलतातून सादर केलेल्या असून त्या कवितांना प्रसिध्दीची अन् लोकप्रियतेची मोहर काव्यरसिक आणि आयोजकांनी बक्षीस रुपाने उठविली आहे. ऋणनिर्देशात ज्ञात-अज्ञात हातांनी सहकार्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून कवी त्यांच्याच ऋणात राहू इच्छितात.
या काव्यसंग्रहात एकूण ७०कवितांचा समावेश आहे. शुभारंभच शिर्षक चैतन्य वेल या काव्याने केला आहे. भावव्यक्तता हा काव्याचा आत्मा आहे.भावनांची झालर आहे.जीवनाचे सार आहेत.आणि मूल्यांचा सुगंध ओळीतून दरवळत राहतो.मुखपृष्ठ तर अप्रतिम डिझाईन केलेले आहे. आकाशाला गवसणी घालणारा शब्दवेल,नभांगणातील नजरेत भरणारा इंदद्रधनू, कॅनव्हासवर साकारुन छायाचित्र स्टॅण्डफलकावर अडकविले आहे.निळसर छटेवरील सफेद रंगछटा काव्यसंग्रहाची नजाकत शोभिवंत करतेय…
काही प्रातिनिधिक स्वरूपात 'चैतन्य वेल' कवितासंग्रहातील मनाला भावनाऱ्या, विचारांना चालना देणाऱ्या कवितांची वैशिष्ट्ये. 'जीवन' कविता रचनेतील काव्यसुमने जीवनवाहिनी नद्या,आल्हाददायक वारा, लतावेली आणि कृषीप्रधान संस्कृतीतील अन्नदाता कृषकाची गोडवी गातात.
उपजूनी अन्न मातीमधूनी
करुनी प्रसन्न जनजीवन|
सुधेसम भासे अन्नकण
कष्टे बळीराजा,तृप्ते जीवन||
सुखाचा पाझर कुठं मिळतोय?आपण सुख शोधायला का धावतोय? समाधान कश्यात मानायला हवे.सुखाचे सत्य काय ?सुखासाठी विचार मंथन कसं आहे.याची महती 'सुख' कवितेतून मांडलेली आहे.
झोकूनी श्रमात तितिक्षेने
मनी पाळते जन आशा
प्राप्त होता समाधान
हीच सुख परिभाषा….
चैतन्य जीवनात यायला काय केले पाहिजे?
काय वर्ज्य केले की काय गवसते हे लक्षात येते. हे चैतन्य कवितेतील रचना आपणाशी हितगुज करतात.
जाणवते संथता गतीची
बोचरे विदारक दैन्य|
वृध्दूनी गती,निर्दालूनी भीती
जीवनी फुले द्यावे चैतन्य||
आनंदी मनाचा साथ छानच ओळीत गुंफलाय.
उदय भास्कराचा करी तम नाश
पसरे प्रकाश प्रमोदीत आकाश
ध्वनी मधूर गाण्यांचा तृप्त करी कर्ण
पसरुनी आनंद सृष्टी तेज अवतीर्ण
'दृष्टिकोन' या काव्यात कवीने मनात विचारांचे थैमान माजताना होणारी घालमेल यथार्थ समर्पक रचनेत मांडलेली आहे.स्वार्थ आणि क्षोभ का उत्पन्न होतो याची आर्तता प्रकर्षाने जाणविते.
जरी मुखवटे बहुसंख्य येथे
करुनी चिंतने साधूनी मौन
इष्टवेळी देण्या ईप्सित उत्तर
अवलंबू सद्विवेकी दृष्टिकोन …..
जरी सुखदुःखांचे वर्तुळचक्र
जरी संभ्रमाचे पसरले क्षोभ
मन-मनगट साधुनी समन्वय
अवलंबू सद्विवेकी दृष्टिकोन….
आठवणीतील घटनाप्रसांगाचा सारीपाट 'स्मृतींचा अमीट ठसा'या काव्यपुष्पात अधोरेखित केला आहे.कर्तृत्वाचा डंका यशाला गवसणी घातली की पिटतात.सगळेजण कौतुक करतात.पण हे यशस्वितेसाठी काय दिव्य केले आहे.याची प्रचिती हे काव्य रसग्रहण करताना येते.
'विचार'नावाच्या काव्यफुलातून सुविचारांची पखरण केली आहे.सत्कार्याला विचारांची जोड मिळाली की प्रगती कशी होत जाते.हा आशयगर्भता असलेली उत्तम कविता आहे.
सारासार विचार
असावी मनाची सवय
विचार बदले नशीब
असो कोणतेही वय…
विचारांची क्षती
होई जीवनाची दुर्गती
करीता थोडा अविचार
थबके आपुली प्रगती...
दृश्य या जगाचा
उद्गम असे विचार
करून सद्विचार
होतील स्वप्न साकार…….
आपल्यातील कलागुणांना मूठमाती कशी द्यावी.याची ओळख करून देणारी कविता 'मत्सर निर्मूलन व्हावे'ही आहे.
चिंता,अहंकार अहमभाव,तुलना आणि मत्सर यांना हद्दपार करायला काय करावे.ते ही रचना वाचताना लक्षात येते.
'क्षमा 'काव्यधारा महापुरुषांचे जीवनाला अंगी बाणविण्यासाठी उपयोगी पडणारे अमृतकण व्यक्त होतात.अप्रतिम शब्दात विचारांचा गौरव केला आहे.
वदिले गौतमांनी
महान क्षमा सद्गुण
करावी व्यक्तीस क्षमा
चूक झाली जर चुकून...
क्षमेची सखोल महती
भगवान महावीर वर्तले
इष्ट क्षमाशील मानवास
त्यांनी शक्तिशाली वर्णिले…..
पुतळा असे मानव
सद्गुण , दुर्गुणांचा
क्षमा असे सद्गुण
शक्तिशाली जनांचा…..
अशा सुंदर सहज सुलभ आशयघन रुपातील विविधांगी विषयावरील कवितांची भेट या काव्यसंग्रहातून घडविली आहे.वाचताना बऱ्याच कविता विचारांना चालना देतात. मंथन चिंतन करायला लावणाऱ्या रचना आहेत.
अप्रतिम 'चैतन्य वेल' मित्रवर्य कवी मनोज अग्रवाल यांचा आहे.आपण यापुढे कवीतेच्या प्रातांबरोबर साहित्य क्षेत्रात चोफेर लेखन करावे.याच आपणास स्नेहपुर्वक सदिच्छा!!
परिचयक-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक -८नोव्हेंबर २०२१
#############################
सुंदरच....!!!!!
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete