पुस्तक परिचय क्रमांक:२११ एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता






वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२११
पुस्तकाचे नांव-एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता आस्वाद आणि अभ्यास
लेखिका: प्रीती जगझाप
प्रकाशन- सप्तर्षी प्रकाशन, सोलापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१४नोव्हेंबर  २०२४
प्रथमावृत्ती 
पृष्ठे संख्या–२०४
वाड़्मय प्रकार-समिक्षण
किंमत /स्वागत मूल्य-३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२११||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता आस्वाद आणि अभ्यास
लेखिका:प्रीती जगझाप
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 बालकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या काव्यसंग्रहाचे समिक्षण …. कवयित्री तथा लेखिका प्रीती जगझाप यांनी 'एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता आस्वाद आणि अभ्यास'या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे.कथेतून कविता आणि काव्यातून कथा फुलविणारे  कवी मनाचे लेखक एकनाथ आव्हाड. 
२०२५च्या मार्च महिन्यात सरांना वाचन साखळी समूहाच्या राज्य स्तरीय वाचनश्री पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून ऐकण्याची संधीमिळाली. त्यावेळी सरांनी आठवणीतल्या कवितेच्या जन्माची कहाणी अन् कविता सादर केल्या होत्या.
मनोरंजनातून ज्ञान देणाऱ्या कथाकविता. माहिती, ज्ञान आणि आनंद देणारं साहित्य बालकुमार वाचकांना खजिनाच खुला केला आहे. बालसाहित्यातील अक्षरकृती असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन बालदिनाच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.
   पुस्तकरुपी परिचयात्मक काव्यग्रंथाच्या मुखपृष्ठावर साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या काव्यसंग्रहाची नावांची कॅलिग्राफी असून बालकुमार कुमारिका कुतूहलाने या नावांचे निरीक्षण करीत आहेत.तर मलपुष्ठावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक भारत सासणे यांचा 'ब्लर्ब' काव्यग्रंथांची सृजनशीलता आणि प्रयोगशीलता अधोरेखित करतो.हे पुस्तक लेखिकेने दीर आणि जाऊ या उभयतांना सस्नेह अर्पित केले आहे.
 'छंद देई आनंद ' बालकवितासंग्रहास गतवर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि'शब्दांची नवलाई'या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्काराने सन्मानित केल्याने बालसाहित्याकडे मराठी साहित्य विश्र्वाचे लक्ष लेखक तथा कवी एकनाथ आव्हाड यांच्या कडे गेले.ते अक्षर पंढरीचे वारकरी आहेत. त्यांचे बालसाहित्याचे तीस अक्षरशिल्पे प्रकाशित झाली आहेत.त्यात कथा, कविता, काव्यकोडी, नाट्यछटा आणि चरित्रे यांचा समावेश आहे.
"करील मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभुशी तयाचे!" हा मातृहृदयी साने गुरुजींचा मंत्र जपत त्यांनी बालसाहित्य निर्माण केले आहे.
लेखक एकनाथ आव्हाड महानगरपालिकेच्या शाळेतील सेवाव्रती विद्यार्थी प्रिय शिक्षक असल्याने शैक्षणिक कार्याच्या कर्तृत्वाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा सोनेरी मुकुट झळकत आहे. त्यांच्या वाणी आणि लेखणीत बालकुमारांना मंत्रमुग्ध करणारी क्षमता आहे.कथाकविता आणि भाषणातून ते मुलांच्या मनावर संस्काराची साखरपेरणी सहज करतात.'बालसाहित्याचे संस्कारपीठ'  या प्रस्तावनेत नांदेडचे डॉ.सुरेश सावंत यांनी या संस्कार लेखांची ओळख करून दिली आहे.
  या पुस्तकाच्या लेखिका प्रीती जगझाप यांनी
कवितासंग्रहांचा सखोलपणे अभ्यास करून लेखन प्रसिद्ध केले आहे.आव्हाडांच्या कविता संग्रहाला 'काव्यरत्नाची'उपमा दिली आहे. आशयातील अध्ययन अनुभव नेमकेपणाने व्यक्त केले आहेत. कवितेची बलस्थाने मृद्रांकित करून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्यला पुस्तक समिक्षणाने एक नवा आयाम दिला आहे.लेखिका पेशाने प्राथमिक शिक्षिका असून त्यांचीहे साहित्य प्रकाशित झाले आहे.अनेक नामांकित संस्था आणि जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक आणि साहित्य सेवेच्या कारल्याची दखल घेऊन अनेक पुरस्काराने विभूषित केले आहे.
 पुस्तकाच्या समारोपानंतर बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड आणि लेखिका प्रीती जगझाप यांच्या साहित्याचा आणि पारितोषिकांचा उंचावलेला आलेख मांडलेला आहे.
 लेखिकेने आपल्या मनोगतात एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचा आस्वाद घेताना मिळालेली शिदोरी इतरांना कशी उपयोगी होईल.यासाठी काव्यसंग्रहाचे बारकाईने अभ्यास करून समिक्षण केलेल्या लेखांचे एकत्रितपणे दस्ताऐवज विशेषतः बाल कुमार वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.
स्व:काव्य रचनेतून आस्वादात्मक समिक्षणाकडे त्या वळल्या यांचे श्रेय त्या कवी एकनाथ आव्हाड यांना दिल्याचे मनोगतात नमूद करतात.या अभ्यासपूर्ण पुस्तकात एकूण पंधरा पुस्तकांचे परिचयात्मक समिक्षण केले आहे.यातील भाषा शैली सहज सुंदर व सोपी असून बाल कुमार वाचकांना खिळवून ठेवणारी आहे.काव्यसंग्रहातील महत्त्वाच्या रचनेतील काव्यपंक्ती आणि त्या कवितेचा अर्थ स्पष्टीकरणासह दिलेला आहे. मुलांच्या आकलनशक्तीला सुयोग्य अशी शब्दमांडणी आहे.खरतर या कवितेतून शालेय जीवनातील अश्वासक जीवनमूल्ये आणि जीवनकौशल्य रुजविण्यासाठी या परिचयाचा मुले,पालक आणि शिक्षकांना मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी दीपस्तंभासारखे उपयोगी पडेल असं मला वाटते.
बोधाई-मुलांचे आचरणविश्व सुसंस्कारित करणारा काव्यसंग्रह गंमत गाणी-बालकांचे भाषाशास्त्र विकसित करणारा बालकविता संग्रह
अक्षरांची फुले-मुलांचे भावविश्व विविध मूल्यांनी गंधित करणारा भावस्पर्शी कवितासंग्रह
पंख पाखरांचे-मुलांच्या नवनिर्मिती आणि कल्पना शक्तीला चालना देणारा कवितासंग्रह हसरे घर-मुलांच्या मनात आनंद पेरणारा बालकविता संग्रह
मज्जाच मज्जा-निसर्गाची,पर्यावरणाची ओळख करून देणारा कविता संग्रह
तळ्यातला खेळ-सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारा बालकविता संग्रह
आभाळाचा फळा-बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह
खरंच सांगतो दोस्तांनो -मुलांमध्ये सामाजिक आणि भावनिक नातं समृध्द करणारा बालकविता संग्रह 
मजेदार गाणी- आयुष्य जगताना सकारात्मकतेने जीवन जगावे या विचारांची ओळख करून देणारा कविता संग्रह 
आनंद झुला -मनोरंजन करत शोधक वृत्तीला चालना देणारा कविता संग्रह 
सवंगडी -अद्भुत कुतूहल निर्माण करणाऱ्या प्राणी जगताची माहिती देणारा कविता संग्रह 
शब्दांची नवलाई -भाषेचे सौंदर्य अलंकारिक शब्दाने खुलते.त्या अलंकारिक व्याकरणाची काव्यरचनेतून ओळख करणारा काव्यसंग्रह 
छंद देई आनंद-विविध विषयांची प्रयोगशील मांडणी असलेला काव्यसंग्रह 
पाऊस पाणी हिरवी गाणी-निसर्गाच्या सौंदर्याची ओळख करून देणारा कविता संग्रह 
असे ‘एक से बढकर एक’काव्य संग्रहाची परीक्षणे नोंदविणारे लेख आहेत.खरचं रसग्रहण करताना कविता आणि त्याच्या आशयाची ओळख होत जाते.यातील बहुतांश रचना आपणाला संग्रही करून विविध कार्यक्रमांत समर्पक वेळी पेश करण्यास उपयुक्त ठरतील अशा आहेत.
      या मातीच्या अनेक कथा 
      या मातीच्या अनेक व्यथा
      या मातीच्या महान तेच्या
        लिहू चला दिव्य गाथा 
खरंच सांगतो दोस्तांनो मधील ऋण कवितेच्या पंक्ती मातृभूमिचे ऋण व्यक्त करतात.
देव म्हणाला त्याला
माझा संदेश आठव
नुसता धावा नको 
प्रयत्न तुझे दाखव 
प्रयत्न हाच देव (बोधाई)
तर हसरे घर मधील साजिऱ्या गोजिरवाण्या बाळाची किती गोड वर्णन खालील ओळीत केले आहे.
बाळ हसल्यावर
घरही असते.
हसणारे घर किती,
सुंदर दिसते.
 पुस्तकांशी दोस्ती करणाऱ्यांना एकटेपणा वाटत नाही.साहित्य चिरकाल टिकणारे आहे. यातील ज्ञान हस्तांतरित होते. सकारात्मक विचार ग्रंथच देतात.
   पुस्तके जरी छोटीमोठी
      विचार नवा देतात….
ग्रंथसखा होऊन आपल्या
आयुष्याला घडवतात…..
अश्या कितीतरी रचना आहेत.
लेखक व कवी एकनाथ आव्हाड यांच्या साहित्याच्या मागोवा कवितासंग्रहाचे समिक्षण विस्तृतपणे मांडले आहे.
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक: दिनांक९ एप्रिल २०२५




Comments